सोयाबीन खरेदीसाठी मुदतवाढ मिळणार? पणन मंत्री रावल यांचा महत्त्वाचा प्रस्ताव!
सोयाबीन खरेदीसाठी मुदतवाढीचा प्रस्ताव : पणन मंत्री रावल
महाराष्ट्र राज्यात सोयाबीन खरेदी जोरात सुरू आहे, आणि 31 जानेवारी ही खरेदीची अंतिम मुदत ठरवण्यात आली आहे. मात्र, शेतकरी आणि लोकप्रतिनिधींनी खरेदी कालावधी वाढवण्याची मागणी केली आहे. त्यामुळे राज्य सरकारने केंद्र सरकारच्या कृषी मंत्रालयाला 7 दिवसांची मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव पाठवला आहे, अशी माहिती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली आहे.
लातूर जिल्ह्याचे वाढीव उद्दिष्ट मंजूर
लातूर जिल्ह्याने त्यांचे खरेदी उद्दिष्ट पूर्ण केले आहे. मात्र, शेतकरी आणि लोकप्रतिनिधींनी वाढीव उद्दिष्टाची मागणी केल्याने 20 हजार मेट्रिक टन अधिक खरेदीसाठी मंजुरी देण्यात आली आहे. यापूर्वी 10 हजार मेट्रिक टन वाढवण्यात आले होते, त्यामुळे आता एकूण 30 हजार मेट्रिक टन सोयाबीन खरेदीसाठी मंजुरी मिळाली आहे.
राज्यातील सोयाबीन खरेदीचा आढावा
राज्यात नाफेड (NAFED) आणि NCCF यांच्या माध्यमातून 562 खरेदी केंद्रांवर 25 जानेवारीपर्यंत 7.81 लाख मेट्रिक टन पेक्षा जास्त सोयाबीन खरेदी झाली आहे. 31 जानेवारीपर्यंत ही संख्या मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे.
पूर्वीही मिळाली होती मुदतवाढ
पूर्वी 12 जानेवारी ही अंतिम तारीख होती, मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याकडे विनंती करून 31 जानेवारीपर्यंत मुदतवाढ मिळवली होती.
पुन्हा वाढीव मुदत मिळणार का?
31 जानेवारीनंतरही अनेक शेतकऱ्यांचे सोयाबीन विकले जाण्याचे बाकी असल्याने राज्य सरकारने पुन्हा 7 दिवसांची मुदतवाढ मिळावी यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवला आहे. आता केंद्र सरकार हा प्रस्ताव मंजूर करते का, याकडे संपूर्ण शेतकरी समुदायाचे लक्ष लागले आहे.
हे पण वाचा : उन्हाळ्यात तिळाची विक्रमी वाढ! हेक्टरी ८ क्विंटल उत्पादन मिळवण्याची खास पद्धत