कांदा बाजारभावाचे भवितव्य: पुढील महिन्यात काय घडू शकते?
कांद्याच्या बाजारात काहीसे चढ उतार सुरु आहेत. कांदा बाजारात सध्या सरासरी १८०० ते २४०० रुपयाने विकला जात आहे. खरिप कांदा बाजारात दाखल होत आहे. तर दोन आठवड्यांनंतर रब्बीचीही काही भागात काढणी सुरु होईल. रब्बी कांद्याची आवक वाढेपर्यंत कांद्याचे भाव टिकून राहू शकतात, असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
जानेवारीच्या सुरुवातीला बाजारात कांद्याची आवक वाढली होती. कांदा भाव ४ हजार ते ५ हजार रुपयांच्या दरम्यान होते. त्यामुळे अनेक भागात पूर्ण पक्च न झालेल्या कांद्याची काढणी सुरु होती. हा कांदा बाजारात आल्यानंतर दरात मोठी घसरण झाली. त्यानंतर मात्र बाजारातील आवक कमी होत गेली. कांदा भावही स्थिरावले आहेत. कांद्याच्या भावात सध्या १०० ते २०० रुपयांचे चढ उतार दिसत असले तरी सरासरी भावपातळी मात्र टिकून आहे. जानेवारीत काही दिवस कांदा भाव १३०० ते १८०० रुपयांपर्यंत आले होते. पण बाजारातील आवक कमी झाल्यानंतर दरात पुन्हा सुधारणा झाली.
सध्या कांद्याला बाजारात सरासरी १८०० ते २४०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. तर गुणवत्तेचा कांदा २६०० रुपयांपर्यंत विकला जात आहे. बाजारातील कांदा आवकही सरासरी पातळीवर होत आहे. आवक कमी जास्त झाल्याचा दरावरही काही प्रमाणात परिणाम दिसत आहे. मात्र बाजारातील आवक मर्यादीत असल्याचा एकूणच आधार कांदा बाजाराला दिसत आहे.
पिकाचे नुकसान
कांदा लागवड यंदो मोठ्या प्रमाणात वाढली होती. पण पाऊस आणि बदलत्या वातावरणाचा कांदा पिकाला फटका बसला. त्यामुळे एकरी उतारा कमी असल्याचे शेतकरी सांगत आहेत. याचा परिणाम बाजारातील आवकेवरही दिसत आहे. तसेच कांदा भाव चांगले तेव्हा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी वेळेच्या आधी काढणी करून कांदा विकला. त्यामुळे खरिपातील कांदा आवकेचा दबाव जास्त वाढण्याची शक्यता कमीच असल्याचे बाजारातील व्यापारी आणि अभ्यासक सांगत आहेत.
इतर राज्यातील आवक
सध्या महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील कांदा बाजारात येत आहे. सध्या महाराष्ट्रातील आवक तलनेत कमी आहे. गुजरात, मध्य प्रदेश आणि राजस्थानधील आवक चांगली आहे. तर गुजरातमधील कांद्याला वरचा भाव मिळत असल्याचे व्यापारी सांगत आहेत. राज्यातील कांदा आवक पुढील काळात काहीशी सुधारण्याचा अंदाज आहे.
निर्यातीला मागणी
भारतातून सध्या कोलंबो, मलेशिया, व्हिएतनाम, बांगलादेश, युएई, श्रीलंका या देशांना कांदा निर्यात सुरु आहे. भारताच्या कांदा निर्यातीत २० टक्के निर्यात शुल्क हा अडथळा कायम आहे. सरकारने निर्यात शुल्क काढल्यास निर्यातीला आणखी चालना मिळेल. तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात वेगवेगळ्या देशांमधून कांदा येत आहे. भारतीय कांद्याला आजही स्पर्धा करावी लागणार आहे
हे पण वाचा : गहू, मका, हरभऱ्याची लागवड वाढली… शेतकऱ्यांसाठी नवे संधीचे दार?