rain-alert-maharashtra: आज पुन्हा गारपिटीचा इशारा: मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वळीवांची शक्यता
rain-alert-maharashtra: गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात हवामानाने अचानक कलाटणी घेतली आहे. दररोज पडणाऱ्या वळीव पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, आज गुरुवार (८ मे) रोजीही पावसाचा जोर कायम राहणार असल्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तवली आहे.
मुंबईत जोरदार पाऊस आणि वादळी वाऱ्यांचा इशारा
हवामान विभागाचे तज्ज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितले की, गुरुवारी मुंबईत वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाची शक्यता आहे. महामुंबई परिसरात शुक्रवारी या पावसाचा जोर ओसरेल, असे हवामान अभ्यासक अश्रेया शेट्टी यांनी स्पष्ट केले.
मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात गारपीट होण्याचा धोका
मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागांमध्ये मेघगर्जनेसह गारपीट होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. विशेषतः रायगड, मुंबई, ठाणे, पालघर, नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांमध्ये याचा परिणाम दिसून येणार आहे. हवामान विभागानुसार, संपूर्ण कोकण व मध्य महाराष्ट्रात ११ मेपर्यंत वळीव पावसाचा इशारा आहे.
तापमानात घट: उन्हाचा तीव्रपणा कमी
हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले की, या अवकाळी वातावरणामुळे मुंबईसह महाराष्ट्रात दुपारच्या कमाल तापमानात सरासरीपेक्षा २ ते ४ अंशांनी घट झाली आहे. त्यामुळे उन्हाचा तीव्रपणा जाणवत नाही.
पहाटेच्या तापमानातही लक्षणीय घसरण
• विदर्भ (चंद्रपूर वगळता): ४ ते ६ अंशांनी घट
• मराठवाडा (धाराशिव वगळता): ३ ते ५ अंशांनी घट
• जळगाव: ६.५ अंश
• अलिबाग: ५.८ अंश
• डहाणू: ५.२ अंश
• कुलाबा: ३.७ अंश
• सांताक्रूझ: २.४ अंश
ही तापमान स्थिती १२ मेपर्यंत टिकून राहणार आहे.
पावसाळी वातावरण, गारपीट, वादळी वारे आणि तापमानातील बदल यामुळे राज्यातील हवामान अस्थिर बनले आहे. नागरिकांनी गरज नसताना घराबाहेर न पडणे, वाहन चालवताना खबरदारी घेणे आणि हवामान विभागाच्या सूचनांकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
हे पण वाचा : खरीप हंगामपूर्वी ‘हे’ एक काम करा आणि वाचवा खतांचा अतिरिक्त खर्च